राज्यात पुढील ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावत कोकण किनारपट्टीपासून ते घाटमाथ्यापर्यंत पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. विशेषतः रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गसह पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नाशिक या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा(Heavy rain ) इशारा हवामान विभागाने दिला आहे. याठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे दररोजच्या जीवनावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नसली, तरी काही ठिकाणी पाण्याचे साचलेले स्वरूप जाणवू शकते. समुद्र किनाऱ्यालगत राहणाऱ्या नागरिकांनी विशेष सतर्क राहावे, अशी सूचना महासागर माहिती सेवा केंद्राने दिली आहे.

घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा:
हवामान विभागाने पुणे घाट परिसरात शनिवारी मध्यरात्रीपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. पुढील काही तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, 23 आणि 24 जून रोजी घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असणार आहे. त्यामुळे पुणे, सातारा, नाशिक या जिल्ह्यांतील नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सर्वाधिक ४१.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये ४१.६ मिमी, रायगडमध्ये ४०.१ मिमी तर मुंबई उपनगरात ३१.७ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. या पावसामुळे(Heavy rain ) काही रस्ते जलमय झाले असून, खेड व दापोली परिसरात वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती.

दरड कोसळण्याच्या घटना; गोदावरी नदीला पूर :
पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ वर दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती, मात्र प्रशासनाने तत्काळ दरड हटवून मार्ग मोकळा केला. याशिवाय बोरघर वावे, चिंचगर कोरेगाव, पन्हाळे फणसूर अशा अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली असून स्थानिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरु आहे.

सध्या गोदावरी नदीसह अनेक नद्यांना पूर आला असून धरणांमधील जलसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लहान होड्यांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आज हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. मात्र २२ जूननंतर या भागांतील पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नांदेड, परभणी, हिंगोलीसह काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हेही वाचा :