कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीने पात्र सोडलं ; पाणी पातळी २९ फुटांवर

कोल्हापूर : गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीने(river ) आज शहरातील पंचगंगा घाट येथे सकाळी 10 च्या सुमारास आपलं पात्र सोडलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर शहरात पावसाने जरी विश्रांती घेतली असली तरी धरण पाणलोट क्षेत्रात आणि ग्रामीण भागात मुसळधार पाऊस सुरू आहे.

यामुळे राधानगरी धरण ६३ टक्के भरलं असून राधानगरी धरणाच्या पॉवर हाऊसमधून ३१०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात होत आहे. यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली असून पंचगंगा नदी २९ फुटांवर वाहत असून ३० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीने (river )आपलं पात्र सोडल्याने यंत्रणा देखील अलर्ट झाली असून आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत.

गेल्या आठवड्याभरापासून पश्चिम घाट माथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली असून पंचगंगा यंदाच्या मोसमात पहिल्यांदा पात्राबाहेर पडली आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात, शाहूवाडी, गगनबावडा, आजरा, राधानगरी यासह धरणपाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने राधानगरी धरणात ६३ टक्के पाणीसाठा झाला आहे. यामुळे धरणाच्या पॉवर हाऊसमधून ३१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. यामुळे पंचगंगा पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून आतापर्यंत जिल्ह्यातील ३० बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

तर आज सायंकाळच्या सुमारास पंचगंगेची(river ) पाणी पातळी ३० फूट ४ इंचावर गेली आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट आहे, तर धोका पातळी ४३ फूट इतकी आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने होणारी वाढ पाहता प्रशासनदेखील अलर्ट झालं असून ज्या मार्गावर आणि बंधाऱ्यावर पाणी आलं आहे, असे मार्ग बंद करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून हवामान खात्याने आज कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पश्चिम घाटमाथ्यासह जिल्ह्यात अति मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यानुसार सकाळपासूनच शहरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

तर पुढील तीन दिवस हवामान खात्याने जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला असून मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. जिल्ह्यात आज अखेर सर्वाधिक ७८८.१ मिमी पाऊस गगनबावडा तालुक्यामध्ये पडला असल्याची नोंद हवामान खात्याकडे करण्यात आली आहे. या पाठोपाठ शाहुवाडी तालुक्यात ३९८ मिमी, आजरा तालुक्यात ४०९.३ मिमी तर राधानगरी तालुक्यात ३८०.९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :