देशातील धार्मिक ध्रुवीकरणावर विद्या बालनने काय म्हटले?

देशात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक प्रचारात धर्माच्या मुद्यावरही भाषणे होत आहे. तर, मागील काही वर्षांपासून देशभरात धार्मिक ध्रुवीकरण होत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यातूनच देशात धार्मिक द्वेष निर्माण होत असल्याचे म्हटले जात आहे. एका बाजूला ही परिस्थिती असताना दुसरीकडे अनेकजण भाष्य करत आहेत. यात आता अभिनेत्री विद्या बालनने  महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. याआधी देशाला कोणतीही धार्मिक ओळख नव्हती पण आता परिस्थिती बदलली असल्याचे तिने म्हटले. 

‘अनफिल्टर्ड बाय समदीश’ या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत विद्या बालनने अनेक प्रश्नांची उत्तरे मनमोकळेपणाने दिली. या मुलाखतीत तिला देशात आता धर्माचे अधिक ध्रुवीकरण झाले आहे असे तिला वाटते का? असे विचारण्यात आले.  या प्रश्नावर उत्तर देताना विद्या बालनने, “होय, मला वाटते की नक्कीच अधिक ध्रुवीकरण झाले आहे.” एक देश म्हणून आपली पूर्वी कोणतीही धार्मिक ओळख नव्हती, पण आता का कळत नाही… हे फक्त राजकारणात नाही, तर सोशल मीडियातही त्याचे प्रतिबिंब दिसते. आपण जगात हरवून गेलो आहोत आणि आपण  आपल्या अशा ओळखीचा शोध घेतोय की ती ओळखच नाही. 

धार्मिक जागांसाठी निधी देत नाही… 

विद्या बालनने सांगितले की, तिने कधीही धार्मिक कामाच्या बांधकामासाठी कधीही पैसे दिले नाहीत. त्यांना निधी, पैसे देण्याऐवजी मी आरोग्य, स्वच्छताविषयक उपक्रम, शैक्षणिक उपक्रमांना निधी देते. मी धार्मिक आहे, सश्रद्ध आहे. मी दररोज पूजा देखील करते असेही विद्याने म्हटले. 

तिला कोणत्या क्षेत्रात काम करायचे आहे असे विचारले असता ती म्हणाली, आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षण. तुम्ही हॉस्पिटल, शाळा किंवा शौचालय बांधत असाल तर मी आनंदाने देणगी देईन, पण कोणत्याही धार्मिक संस्थेसाठी नाही असेही तिने स्पष्ट केले. 

राजकारणापासून दोन हात लांब….

या दरम्यान विद्याने सांगितले की,  राजकारणावर भाष्य करणार नाही. कोणत्याही कमेंटमुळे एखाद्याला राग येतो आणि मग तुमच्यावर बहिष्कार टाकला जातो असेही तिने म्हटले. विद्या बालनने पुढे म्हटले की, मला राजकारणाची खूप भीती वाटते, आमच्यावर बंदी वगैरे घातली जाईल असे वाटते. अर्थात अजून तरी माझ्यासोबत असे घडले नाही. पण आता कलाकार राजकारणावर बोलत नाहीत कारण कोणाला राग येईल हे कधीच कळत नाही. विशेषतः चित्रपट रिलीजच्या दरम्यान कधीच बोलत नाही. एका चित्रपटावर 200 लोक मेहनत करतात, चित्रपटाला त्या राजकीय कमेंटचा फटका बसल्यास त्या 200 लोकांचेही नुकसान असते  त्यामुळे मी राजकारणापासून दूर राहते,असेही तिने म्हटले.