प्रकाश आंबेडकर यांचं सर्वात मोठं विधान

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान झालं आहे. आणखी तीन टप्प्याचं राज्यातील मतदान बाकी आहे. त्यापूर्वीच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सर्वात मोठं विधान केलं आहे. काँग्रेस आणि वंचितच्या आघाडी संदर्भातील हे विधान आहे. सप्टेंबर – ऑक्टोबरमध्ये विधानसभा आहे. त्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र लढू शकते. तेव्हा नाराजी काढा आणि वंचित बहुजन आघाडीला मदत करा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे. ज्या प्रमाणे दुसऱ्या टप्प्यात विदर्भात आणि मराठवाड्यात आम्हाला पाठिंबा मिळाला आहे. त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देश या भागातही आम्हाला मतदारांचा चांगला पाठिंबा मिळत आहे. मुंबईमध्ये दोन दिवसांत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे करणार आहोत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

वर्षा गायकवाड बळीचा बकरा

काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिलेली आहे, पण त्यांचा आमदारकीचा मतदारसंघ सोडून उमेदवारी दिलेली आहे. वर्षा गायकवाड यांच्यासंदर्भात म्हणावे लागेल की, बळीचा बकरा काँग्रेसकडून दिलेला आहे, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.

तो मतदार आमच्याकडे वळला

एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरे यांची शिवसेना लढत होणारे असे काही मतदारसंघ आहेत. त्यामध्ये काँग्रेस शिवसेनेच्या उमेदवाराचे काम करत नाही आणि शिवसेना काँग्रेसच्या उमेदवारांचे काम करत नाही. त्यामुळे धर्मनिरपेक्ष मतदार हा आमच्याकडे वळला असल्याची परिस्थिती आहे, असंही ते म्हणाले.

200 पारही नाही

2014 पासून ते आतापर्यंत 17 लाख कुटुंबांनी भारताचे नागरिकत्व सोडून परदेशी नागरिकत्व स्वीकारले आहे, असे सरकार स्वतःच म्हणत आहे. आम्ही असे म्हणतो की, नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नाहीत, तर गुजरातचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे लोकांनी आता धडा घ्यावा. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका चालू होत्या, त्यावेळी याच चर्चेला सुरुवात झाली होती. नवीन सर्व्हेनुसार भाजप कुठेही 200 पार करत आहे, असे दिसत नाही, असंही आंबेडकर म्हणाले.

समान नागरी कायदा करून दाखवावा

अमित शहा यांनी समान नागरी कायदा लागू करणार असे वक्तव्य एका सभेत केले होते, त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. समान नागरी कायदा भाजपने करूनच दाखवावा. भाजप आणि आरएसएस स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेईल असे मला वाटत नाही. तो संसदेचा कायदा आहे. संविधानाने प्रत्येक धर्माला सुरक्षा दिलेली आहे. असं त्यांनी सांगितलं.