बीसीसीआयचा (BCCI) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल भारतात घेण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्याचं आता दिसून येत आहे. इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC) भारताला ही संधी देईल असं वाटत नाहीये. इंग्लंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे यजमानपद कायम राखले असून, पुढील सहा वर्षे ही जबाबदारी त्यांच्याकडेच राहण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयचे प्रयत्न निष्फळ?
भारतीय क्रिकेट बोर्ड गेल्या काही वर्षांपासून इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलकडे विनंती करत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल भारतात खेळवण्यात यावा. मात्र, टेलिग्राफच्या एका अहवालानुसार, इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलने पुढील तीन फायनल्स इंग्लंडमध्येच आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच 2025, 2027 आणि 2029 मधील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल्स भारतात होण्याची शक्यता आता जवळपास संपली आहे.
प्रतीक्षा 8 वर्षांची
इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलच्या या निर्णयामुळे भारताला किमान 8 वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 2029-31 च्या सत्रात भारताला पहिल्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल होस्ट करण्याची संधी मिळू शकते. इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलची वार्षिक बैठक यंदा जुलै महिन्यात सिंगापूरमध्ये होणार आहे, जिथे अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
क्रिकेटविश्वात मोठी चर्चा
विशेष म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलचे चेअरमन सध्या जय शाह आहेत, जे बीसीसीआय(BCCI) चे माजी सचिव आहेत. एवढं असूनही भारताला फायनलचे यजमानपद मिळू शकत नसल्याने ही गोष्ट सध्या क्रिकेटविश्वात मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे. बीसीसीआयचा आर्थिक आणि क्रिकेटमधील दबदबा लक्षात घेता, भारताला यजमानपद न मिळणे अनेकांना धक्का देणारं आहे.
इंग्लंडचं अधिराज्य कायम
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप चा पहिला फायनल 2021 मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात साउथॅम्प्टनमध्ये झाला होता. दुसरा फायनल 2023 मध्ये ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला. आणि आता 2025 मध्ये लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात फायनल खेळवला जाणार आहे.
हेही वाचा :