मुंबई : नरेंद्र मोदी हे 11 वर्षांपासून पंतप्रधानपदावर आहेत पण 11 वर्षांत त्यांनी जनतेला दिलेल्या आश्वासनातील एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. मोदी व फडणवीस जे बोलतात ते कधीच करत नाहीत. स्वतःला फकीर म्हणवणारे नरेंद्र मोदी लाखो रुपये किंमतीची जॅकेट्स, लाखो रुपयांचे कपडे वापरतात, महागड्या वस्तू वापरतात, ते योगी नाही तर सत्ताभोगी असून, जनतेला दिलेली वचने पूर्ण न करणारे अधर्मी आहेत, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस(Congress ) कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेनंतर ही यात्रा 15 जूनपर्यंत स्थगित करण्यात आली. विधानसभा निवडणुकीतील मतचोरीची चौकशी करावी यासाठी काँग्रेस(Congress ) पक्षाने गुरुवारपासून राज्यभर मशाल मोर्चे काढण्याचे निश्चित केले होते. गुरूवारी गडचिरोलीत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली मशाल मोर्चा व शेतकरी न्याय पदयात्रा काढण्यात आली. यावेळी विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, खासदार नामदेव किरसान आदी उपस्थित होते.
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, ‘आपण सतत गडचिरोलीचा दौरा करतो असा टेंभा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिरवत असतात. पण ते गडचिरोलीच्या विकासासाठी नाही, तर सुरजागडच्या लोह खाणीतून मिळणाऱ्या मलईतून स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी येतात. स्टील सीटी करण्याच्या नावाखाली तिघे भाऊ महाराष्ट्र लुटून खाऊ, असे भाजप-युती सरकारचे सुरू आहे. शेतकऱ्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे’.
सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. कर्जमाफी देत नाहीत, कर्जमाफीसाठी पैसे नव्हते तर घोषणा का केल्या. शेतकऱ्यांशी बेईमानी करणा-या महायुती सरकारला धडा शिकवावाच लागेल. लाडक्या बहिणींचा विश्वासघात केला, २१०० रुपये देण्याची घोषणा केली पण आता १५०० रुपयेही मिळणे अवघड झाले आहे.
गडचिरोलीतील शेतकरी, आदिवासी, शेतमजूर, स्थानिकांवर सुरा फिरवत आहेत. फडणवीस यांना गडचिरोलीचे फडणवीसस्थान करायचे आहे. सुरजागडच्या खदानीला विरोध करू नये म्हणून हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडून खदानीला विरोध करणार नाही, मोर्चात सहभागी होणार नाही असे लिहून घेतले जाते.
हेही वाचा :