वर्षा गायकवाड यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर

हाराष्ट्र काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत महाविकास आघाडीत जोरदार घडामोडी घडल्या. चर्चेअंती काँग्रेसला मुंबईत दोन लोकसभेच्या जागा सोडण्याचा निर्णय झाला. पण यापैकी एका जागेवर ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांच्या नावाची चर्चा होती. विनोद घोसाळकर आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते उमेदवारीसाठी आग्रही असल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी त्यांना काँग्रेसच्या तिकीटावर लढण्याची ऑफर दिली. यानंतर काँग्रेसमध्ये जोरदार खडाजंगी झाली. मधल्या काळात वर्षा गायकवाड या नाराज असल्याची बातमी समोर आली होती. विशेष म्हणजे वर्षा गायकवाड या काँग्रेसच्या नेत्यांनादेखील भेटल्या नव्हत्या. तसेच त्यांच्या अनुपस्थितीमुळे काही दिवसांपूर्वी मुंबई काँग्रेसची बैठक रद्द झाली होती. यानंतर आता वर्षा गायकवाड यांना पक्षाकडून मोठी संधी देण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाने वर्षा गायकवाड यांना मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीची संधी दिली आहे.

काँग्रेसकडून उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीतून उत्तर मध्य मुंबईची जागा काँग्रेसला देण्यात आली होती. त्यानंतर वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. उत्तर मध्य मुंबई लोकसभेच्या मतदारसंघातून अजून महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नव्हती. अखेर महाविकास आघाडीकडून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानंतर आता महायुतीकडून कुणाला उमेदवारी जाहीर केली जाते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याआधी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. पण त्यांना उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी जाहीर करण्यात आलीय.

भाजपकडून कुणाला उमेदवारी?

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपच्या पूनम महाजन या विद्यमान खासदार आहेत. पूनम महाजन या गेल्या 10 वर्षांपासून या मतदारसंघात खासदार आहेत. यावेळी पूनम महाजन यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण असेल? याबाबत सातत्याने चर्चा सुरु आहेत. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर या मतदारसंघासाठी उमेदवार शोधण्याची जबाबदारी आहे. याआधी माधुरी दीक्षित, रविना टंडन, अनुराधा पौडवाल यांची नावे भाजपचे उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. पण अद्यापही भाजपकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. दुसरीकडे काँग्रेसकडून आता उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता भाजपकडून कोण उमेदवार असेल? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.