पुण्याच्या मध्यभागात पुन्हा तरुणीवर कोयत्याने हल्ला
![](https://alphabetnews.in/wp-content/uploads/2024/04/pune_1687917631221_1687917640468.jpg)
सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेम प्रकरणातून कॉलेज तरुणीवर हल्ला झाल्याची पुनरावृत्ती आज पुन्हा एकदा घडली. आकरावीत शिकत असलेल्या मुलीवर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात अडवत कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना भरदुपारी घडली. येथून जाणाऱ्या महिलेने आरडा-ओरडा केल्यानंतर दुचाकीवरून आलेले दोन तरुण पळून गेले.
त्यांनी जाताना चांगलाच गोंधळ घातला. एका व्यक्तीला कोयता दाखवत धमकावले आणि अंधाधुंद कोयतादेखील फेकत गोंधळ घातला, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. हा सर्व प्रकार सुभाषनगर भागात घडला असून, यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. पसार झालेल्या मुलांचा पोलीस शोध घेत आहेत. मुलगी बोलत नसल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याची माहिती आहे.
याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात महेश सिद्धप्पा भंडारी (२२) आणि त्याच्यासोबत असलेल्या एकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांकडूनच सु-मोठो तक्रार करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महेश जनता वसाहतीत राहत आहे. तर कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी पर्वती दर्शन येथे राहते. दोघे ओळखीचे आहेत. दरम्यान, मुलगी व तिच्या तीन मैत्रिणी दुपारी सुभाषनगर येथील गल्ली क्रमांक ६ येथून जात होत्या. या दरम्यान महेश व त्याचा मित्र येथे आले. महेशकडे कोयता होता. हे दोघे बोलत असताना त्यांच्यात वाद झाला.
त्यावेळी महेशने तिच्यावर कोयता उगारला. तिला मारहाण करीत तिच्यावर कोयत्याने हल्ला केला. पण, त्याचवेळी एक महिला येथून जात असताना तिने हा प्रकार पहिला आणि ती जोरात ओरडली. महिला ओरडल्याने नागरिक जमा झाले. काही तरुण व व्यक्ती धावत येथे आले. पण, तरीही दोघे तरुण दुचाकी सुसाट पळवत हातात कोयता फिरवत नागरिकांना घाबरवण्याचा प्रयत्न करू लागले. क्षणात मोठी गर्दी झाली. त्यावेळी तरुणाने हातातील कोयता फेकून मारला आणि पळ काढला, असे नागरिकांनी सांगितले.
नागरिकांनी ही माहिती खडक पोलिसांना दिली. तत्काळ येथे पोलीस दाखल झाले. पण, तोपर्यंत दोघे दुचाकीस्वार येथून पळून गेले होते. नागरिकांनी त्यांचे फोटो व दुचाकी याचे फोटो पोलिसांना दिले. माहिती घेतली असता हा तरुण जनता वसाहतीत राहत असल्याचे समजले. त्याने दुचाकी दुसऱ्या एका मित्राची आणली होती. त्या मित्राला पोलिसांनी बोलावले आहे. दरम्यान, दोघे तरुण पसार आहेत. त्यांचा युद्ध पातळीवर शोध घेतला जात आहे. पण, त्याचा रात्रीपर्यंत शोध लागला नाही.
पोलिसांना घटनेचे गांभीर्यच कळले नसल्याचे स्पष्ट
दरम्यान, पोलिसांना याबाबत विचारल्यानंतर पोलिसांनी मात्र हल्ला झाला नाही. त्याचा कोयता खाली पडला होता, असे सांगितले आहे. परंतु, पोलिसांना या घटनेचे गांभीर्यच कळले नसल्याचे दिसून येत आहे. मोठी घटना घडल्यानंतर देखील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ काही तासांनी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यावेळी त्यांना काही प्रत्यक्षदर्शीनी माहिती दिली.
बोलत नसल्यावरून हल्ला..!
पेरुगेट चौकीजवळ कॉलेज तरुणीवर अश्याच प्रकारे हल्ला झाला होता. एकतर्फी प्रेमातून कोयत्याने वार करण्याचे प्रयत्न केले होते. सुदैवाने ती तरुणी बचावली होती. पण, त्यानंतर महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा अशीच घटना घडली आहे. सुदैवाने ही देखील तरुणी हल्यात बचावली आहे. पण, प्रत्यक्षदर्शीच्या माहीतीनुसार तिला मारहाण झाली. पण, ती काहीच बोलली नाही. ती बोलत नाही, या रागातून हा हल्ला झाला आल्याचे सांगण्यात आले आहे.
सीसीटीव्ही बंद अन्यथा गांभीर्य वाढलं असतं..!
सुभाषनगर परिसर उच्चभ्रू म्हणून समजला जातो. पण, या परिसरातील शासकीय सीसीटीव्ही बंद असल्याचे सांगण्यात आले आहे. एका ठिकाणी सीसीटीव्ही आहे पण त्या सीसीटीव्हीला झाड आडवे आले आहे.