कतरिना कैफ झाली भारताशी वाद घालणाऱ्या देशाची ग्लोबल ब्रँड अ‍ॅम्बेसेडर; नवा डाव?

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि फॅशन आयकॉन कतरिना कैफला मालदीव पर्यटन विभागाने त्यांच्या नवीन जागतिक ब्रँड अ‍ॅम्बेसेडरपदी( brand ambassador) नियुक्त केलं आहे. मालदीव मार्केटिंग अँड पब्लिक रिलेशन्स कॉर्पोरेशन ने त्यांच्या ‘समर सेल कॅम्पेन’च्या उद्घाटन प्रसंगी ही घोषणा केली. या मोहिमेचा उद्देश जगभरातील पर्यटकांना खास करून भारतीय पर्यटकांना पुन्हा मालदीवकडे आकर्षित करणे आहे.

कतरिनाची ओळख केवळ एका यशस्वी अभिनेत्री म्हणून नाही, तर ती एक बिझनेस वूमन, आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखली जाणारी व्यक्तिमत्त्व आणि स्टाईल आयकॉन देखील आहे. तिची उर्जा आणि प्रभावामुळे ती मालदीवसारख्या टुरिस्ट डेस्टिनेशनसाठी एक आदर्श प्रतिनिधी ठरते. Visit Maldives च्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर यासंदर्भात पोस्ट शेअर करण्यात आली आहे, ज्यामध्ये कतरिनाच्या सहकार्याबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला आहे. Visit Maldives चे CEO इब्राहिम शिउरे यांनी सांगितले की, ‘कतरिनाची उपस्थिती आणि जागतिक लोकप्रियता हिला आमच्या ब्रँडसाठी( brand ambassador) परिपूर्ण बनते. तिच्या सहभागामुळे आमचा हा कॅम्पेन अधिक प्रभावी ठरेल.’

मालदीवचे समर सेल कॅम्पेन
या मोहिमेंतर्गत मालदीवमध्ये लक्झरी रिसॉर्ट्स, बुटीक हॉटेल्स आणि कुटुंबासाठी अनुकूल निवासस्थानांवर विशेष ऑफर्स दिल्या जात आहेत. हे कॅम्पेन भारत, यूके, रशिया, इटली, स्पेन, पोलंड, जर्मनी, ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंडसारख्या बाजारपेठांमध्ये जोरदारपणे राबवली जात आहे. यामागे 2025 च्या उन्हाळ्यासाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंगला प्रोत्साहन देणे आणि मालदीवची जागतिक ओळख अधिक दृढ करणे हा उद्देश आहे.

जानेवारी 2024 मध्ये मालदीवच्या काही अधिकाऱ्यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्यांमुळे #BoycottMaldives ही मोहिम सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंड झाली. अनेक भारतीय पर्यटकांनी मालदीवच्या ट्रिप्स रद्द केल्या आणि त्यामुळे पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसला. त्यामुळेच भारतीय पर्यटकांचा विश्वास पुनःप्राप्त करण्यासाठी मालदीव सरकारने बॉलिवूड सुपरस्टार कतरिना कैफला ग्लोबल ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवडण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट होते.

 

कतरिना कैफसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय अभिनेत्रीच्या सहभागामुळे मालदीवला पुन्हा एकदा भारतीय पर्यटकांसाठी प्राधान्याची डेस्टिनेशन बनवण्याचा प्रयत्न आहे. तिची प्रतिमा आणि प्रभावामुळे ही मोहीम केवळ पर्यटनच नव्हे तर द्विपसमूहाच्या ब्रँडिंगसाठी देखील मोलाची ठरणार आहे.

हेही वाचा :