इचलकरंजी शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढतच चालला आहे.

इचलकरंजी शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढतच चालला आहे. अवघ्या आठवडाभरात घोडा आणि माकडावरील हल्ल्याची (attack) घटना ताजी असताना सोमवारी कुत्र्यांच्या कळपाने सुंदरबागेत एका मांजरावर हल्ला करुन त्याची चिरफाड केल्याची घटना घडली. या भटक्या कुत्र्यांचा महानगरपालिका प्रशासनाने त्यांचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी माणुसकी फौंडेशनचे संस्थापक रवींद्र जावळे व परिसरातील गाळेधारकांनी केली आहे.
महानगरपालिका मालकीच्या सुंदर बागेत दुपारच्या सुमारास एका मांजरावर पाच ते सहा कुत्र्यांनी हल्ला केला. मांजराने त्यांच्यापासून सुटका करण्यासाठी बरीच धडपड केली. पण चोहोबाजूंनी घेरत मांजराला पकडून त्याची चिरफाड केली. ही घटना लक्षात आल्यानंतर तेथील गाळेधारकांनी कुत्र्यांना हकलण्याचा प्रयत्न केला. पण कुत्र्यांनी हल्ला सुरुच ठेवला होता. अखेर याबाबतची माहिती माणुसकी फौंडेशनचे रवींद्र जावळे यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत कुत्र्यांच्या हल्ल्यात मांजर गतप्राण झाले होते.


लहान मुलांसह महिला याठिकाणी विरंगुळा व मनोरंजनासाठी येत असल्याने सुंदरबागेत नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत चालला आहे. यापूर्वी एका महिलेवर कळपाने हल्ला करुन वृध्देचा बळी घेतला आहे. तर काही दिवसांपूर्वी एका घोड्यावर व माकडावर हल्ला करुन त्यांचे लचके तोडले होते. त्यामुळे ही कुत्री आता माणसांवर कधीही हल्ला करतील. बागेत विशेषत: लहान मुलांची गर्दी असल्याने एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी रवींद्र जावळे व गाळेधारकांनी केली आहे. यावेळी उपस्थित चैतन्य चव्हाण, ऋषिकेश सातपुते, ओंकार सुतार, सतीश नायडु , दिपक खटावकर, स्टीफन आवळे,महेंद्र कुरणे, रणजीत कोळी, प्रशांत औताडे,रोहन सिध्दुनेरलेकर,अजय राठोळ , श्रवण नायडु यावेळी उपस्थित होते…..

हेही वाचा :

विशाल पाटील यांचा कॉंग्रेसला पाठिंबा

 पावसाचा धुमाकूळ विदर्भ, कोकणसह मराठवाड्यात दमदार पावसाच्या सरी

राजू शेट्टींचं काय चुकलं? सदाभाऊ खोतांच उत्तर