उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. एप्रिल महिन्यातच तापमानाचा पारा 40 अंशावर पोहोचला आहे. मुंबईत तापमान कमी असले तरी उन्हाची काहिली जाणवत आहे. मुंबईकरांना दररोज ऑफिससाठी लोकलने प्रवास करावा लागतो. लोकलची गर्दी आणि उन्हाळा यामुळं घामाच्या धाराने मुंबईकर हैराण झाले आहेत. मुंबईकरांचा प्रवास सोयीचा व्हावा यासाठी मध्य रेल्वेने मोठे पाऊल उचलले आहे. त्यामुळं नागरिकांचा प्रवास गारेगार होणार आहे.
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर लवकरच पुन्हा एसी लोकल सुरू करण्यात येणार आहे. एक ते दीड महिन्यात नवी एसी लोकल ताफ्यात येणार असून, ती हार्बर मार्गावर चालविण्याचे नियोजन असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हार्बर मार्गावर 2020 साली एसी लोकल चालविण्यात आली होती. परंतु कालांतराने ती बंद करण्यात आली.
प्रवाशांची वाढती मागणी पाहता या मार्गावर पुन्हा एसी लोकल सुरू करण्याच्या निर्णयाप्रत प्रशासन आले आहे. सध्या हार्बरवर 12 डब्याच्या 614 नॉन एसी लोकलच्या फेऱ्या चालवल्या जात आहेत. एसी लोकलच्या नवीन फेऱ्या असतील की काही नॉन एसी फेऱ्यांऐवजी एसी लोकल चालविण्यात येतील, हे अद्याप ठरलेले नाही.