डी.जी.पी. ते न्यूरो सर्जन उच्च वर्तुळातील शोकांतिका!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : सर्व प्रकारच्या, उच्च दर्जाच्या सोयी, सुविधा अगदी सहजरीत्या उपलब्ध आहेत. समाजाकडून मानसन्मान, प्रतिष्ठा मिळत आहे. पैशाची अजिबात कमतरता नाही, उलट या पैशाचे करायचे काय? असा प्रश्न पडावा. संपन्न स्थिती, कृतार्थ जीवन सर्व प्रकारचे सुख पायाशी लोळण घेते आहे, एकूणच कोणीही हेवा करावा अशी समृद्ध पार्श्वभूमी असूनही
आयुष्याचा शेवट चांगला होतोच असे नाही, हे कर्नाटकातील बंगळुरू आणि महाराष्ट्रातील सोलापूर शहरात घडलेल्या हत्या(Murder) आणि आत्महत्या प्रकरणातून सिद्ध झाले आहे. दोन्हीही घटना किंवा शोकांतिका या उच्च वर्तुळात घडलेल्या आहेत आणि म्हणूनच खळबळ उडाली आहे.

कर्नाटक राज्याचे सेवानिवृत्त पोलीस महासंचालक श्री. ओम प्रकाश यांची त्यांच्याच आलिशान निवासातील डायनिंग हॉलमध्ये त्यांच्याच पत्नीकडून आणि मुलीकडून हत्या(Murder) झाली. पोलीस महासंचालकाची हत्या होण्याची देशातील ही पहिलीच घटना म्हणावी लागेल. ओम प्रकाश यांच्या पत्नी पल्लवी आणि कन्या कृती या दोघींना बंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे.

ओम प्रकाश यांच्या हत्येला अनेक पैलू आहेत. पोलीस सेवेच्या माध्यमातून जमा केलेली अफाट संपत्ती आणि मालमत्ता, ओम प्रकाश यांची रंगेल वृत्ती, आलिशान फॉर्म हाऊस येथे वारंवार होणाऱ्या पार्ट्या, तेथे ललनांचा असणारा वावर, त्यातून निर्माण झालेला कुटुंब कलह, असे अनेक अनैतिक पैलू या हत्या प्रकरणाच्या मागे आहेत.

पोलीस अधीक्षक ते राज्याचे पोलीस महासंचालक असा ओम प्रकाश यांचा प्रवास आहे. अमर्याद अधिकार असल्यामुळे त्यांनी 30-35 वर्षांच्या पोलीस सेवेत अमर्याद संपत्ती मिळवली. चल आणि अचल धनसंपदेच्या वादातून त्यांची हत्या(|Murder) झाली असावी असा प्राथमिक अंदाज असला तरी आलिशान निवासामध्ये राहणाऱ्या या कुटुंबात वाद होता आणि तो विकोपाला गेला होता.

आपण मिळवलेली वैध आणि अवैध मार्गाने मिळवलेली संपत्ती आपल्या आयुष्याचा घात करणार आहे हे ओमप्रकाश यांना समजले नाही. सेवानिवृत्तीनंतर ते आपल्या कुटुंबावर अधिकार गाजवत होते. पत्नीशी नीट वागत नव्हते. पत्नीला कायम मृत्यूच्या दहशतीखाली ते ठेवत होते. त्यातून वैतागलेल्या त्यांच्या पत्नीने डायनिंग हॉलमध्ये ओम प्रकाश हे जेवत असताना त्यांच्यावर पल्लवी यांनी हल्ला केला. डोळ्यात तिखट पूड टाकली आणि नंतर चाकूने सपासप वार केले.

डायनिंग टेबल च्या खाली तडफडून त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्यांनी आपल्या पोलीस सेवेत अनेक खुन प्रकरणांचा तपास केला, त्यांना आपलाही शेवट असाच प्रकारे होईल असे स्वप्नातही वाटले नसेल. समाजाच्या उच्च वर्तुळात घडलेल्या या घटनेने खळबळ उडणे स्वाभाविक होते आणि आहे. आता त्यांचे कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. ओम प्रकाश यांनी आपल्या आयुष्यात काय कमावले? पत्नीने त्यांचा एक जेवत असताना जीव घ्यावा यापेक्षा वाईट ते काय?

दुसरी घटना महाराष्ट्रातील

सोलापूर शहरात घडलेली. डॉक्टर शिरीष वळसंगकर हे विख्यात मेंदू विकार तज्ञ. मुलगा डॉक्टर, सून डॉक्टर, उच्च वर्तुळातील प्रतिष्ठित कुटुंब. सुसज्ज हॉस्पिटल. बक्कळ कमाई. पण अचानक डॉक्टर वळसंगकर यांनी टोकाचा निर्णय घेतला. त्यांच्या मेंदूने त्यांना तशी अज्ञात दिली असावी. परवाना प्राप्त अग्निशस्त्र अर्थात रिवाल्वर मधून त्यांनी डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली.

या घटनेने सोलापूर जिल्हा हादरला. डॉक्टर वळसंगकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट मागे ठेवली होती. त्यामध्ये त्यांच्या रुग्णालयाच्या प्रशासन अधिकारी मनीषा मुसळे माने यांना जबाबदार धरले आहे. मनीषा ह्या डॉक्टर वळसंगकर यांच्या मानस कन्या म्हणून ओळखल्या जायच्या. रुग्णालयाच्या मालकिण असल्यासारखा त्यांचा रुबाब आणि तोरा होता. डॉक्टर वळसंगकर यांना त्यांनी धमकी दिली होती.

मी आत्महत्या करेन आणि सुसाईड नोट मध्ये तुमचे नाव घालेन या त्यांच्या धमकीमुळे डॉक्टर वळसंगकर हे काही दिवसांपासून तणावामध्ये होते. ते अस्वस्थ होते, मानसिक संतुलन बिघडल्यासारखे होते. त्यांचे आणि त्यांची मानसकन्या मनीषा मुसळे माने यांच्यात नेमके काय नातेसंबंध होते हे कळावयास मार्ग नाही. ते मेंदू विकार तज्ञ असूनही, त्यांच्या मनात उलट सुलट विचारांची घालमेल सुरू होती. सुसाईड नोट मध्ये त्यांनी मनीषा मुसळे माने यांना जबाबदार धरले असले तरी नेमके कारण मात्र स्पष्ट केलेले नाही. पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा असूनही डॉक्टर शिरीष वळसंगकर हे व्यक्तिगत आयुष्यात सुखी नव्हते. मनीषा मुसळे ही रुग्णालयात सामान्य कर्मचारी म्हणून आली आणि बघता बघता ती प्रशासन अधिकारी बनली.

रुग्णालय विषयक सर्व प्रकारचे अधिकार तिने आपल्याकडे घेतले होते. ती आली आणि नंतर काही वर्षात डॉक्टर शिरीष यांच्या सुखी जीवनाला ग्रहण लागले. रुग्णांच्या मेंदूवर उपचार करणारे डॉक्टर शिरीष हे पलायनवादाचा विचार करायला लावणाऱ्या स्वतःच्या मेंदूवर उपचार करू शकले नाहीत. बंगळुरू आणि सोलापूर या दोन शहरात घडलेल्या हत्या आणि आत्महत्या प्रकरणातून एक सत्य समोर आले आहे आणि ते म्हणजे या जगात कोणीही माणूस सुखी नाही. कोणालाही सुखी माणसाचा सदरा अद्याप सापडलेला नाही.

हेही वाचा :

कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेतर्फे संघटन तुमच्या दारी उपक्रम

डॉ.शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्ये मागे गृहकलहच सूनेनेच दिली होती ही धमकी

घोड्यांमुळे वाचला 28 कोल्हापूरकरांचा जीव; नेमकं घडलं काय जाणून घ्या


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *