भारत पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट(BCCI) संघाबद्दल अनेक गोष्टी चर्चेत येत आहेत. अशीच एक चर्चा सोमवारी समोर आली की भारतीय क्रिकेट संघ यावर्षी आशिया कप आणि महिला इमर्जिंग संघ आशिया कपमध्ये सहभागी होणार नाही. मीडिया रिपोर्ट्समध्येही असेच दावे सोमवारी करण्यात आले.

ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. पण आता बीसीसीआयचे(BCCI) सचिव देवजीत सैकिया यांनी स्वतः हे दावे फेटाळून लावले आहेत. देवजीत सैकिया म्हणाले की, ” ही बातमी पूर्णपणे खोटी आहे आणि आशिया कपमध्ये सहभागी होण्याबाबत कोणतीही बैठकही झालेली नाही.”
ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना देवजीत सैकिया म्हणाले की, “आज सकाळपासून अशी बातमी समोर येत आहे की BCCI ने पुरुष आशिया कप आणि महिला इमर्जिंग टीम्स एशिया कपसाठी भारतीय संघ न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही स्पर्धा Asian Cricket Council (ACC) अंतर्गत येतात. मात्र, आम्ही स्पष्ट करू इच्छितो की या बातम्यांमध्ये कोणतीही तथ्य नाही.”
ते पुढे म्हणाले, “आशिया कपमध्ये सहभागी व्हायचं की नाही, यासंदर्भात अद्याप कोणतीही बैठक झालेली नाही. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याचाही प्रश्नच उद्भवत नाही.”
सैकिया यांनी स्पष्ट केलं की सध्या बीसीसीआयचं पूर्ण लक्ष IPL 2025 आणि इंग्लंडविरुद्ध पुरुष व महिला मालिका यांच्यावर केंद्रित आहे. त्यामुळे ACCच्या स्पर्धांबाबत अद्याप कोणताही विचार वा निर्णय झालेला नाही.

आशिया कप 2025 हे या स्पर्धेचं 17वं सीजन असणार आहे. मात्र, या स्पर्धेचं यजमानपद अद्याप जाहीर झालेलं नाही. या वर्षी भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, ओमान, हाँगकाँग आणि यूएई असे एकूण 8 संघ या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
दुसरीकडे, महिला इमर्जिंग टीम्स आशिया कप 2025 ची यजमानी श्रीलंका करणार आहे. या स्पर्धेचं पहिलं आयोजन 2023 मध्ये झालं होतं, जिथे अंतिम सामन्यात भारताच्या महिला संघाने बांगलादेशला 31 धावांनी पराभूत करून जेतेपद पटकावलं होतं.
हेही वाचा :
हृतिक- ज्युनियर एनटीआर अफलातून जुगलबंदी; ‘वॉर २’चा धमाकेदार टीझर रिलीज
एअरटेलच्या ग्राहकांना मिळणार 100 जीबी गुगल वन क्लाउड स्टोरेज मोफत
धोनीच्या निवृत्तीवर मोठे अपडेट समोर, अखेर कोचने तीन शब्दात खरं काय ते सांगून टाकलं