जम्मू-काश्मीरमधून हादरवून टाकणारी बातमी समोर

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या लष्करी संघर्षात जम्मू-काश्मीरमध्ये एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे(news). राज कुमार थापा असे मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचे नाव असून, ते अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त म्हणून कार्यरत होते. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या उखळी तोफांच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, राजौरी येथील अधिकाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थानावर पाकिस्तानने उखळी तोफांनी हल्ला केला, ज्यात राज कुमार थापा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. “राजौरीतून एक हादरवून टाकणारी बातमी(news) आली आहे. आपण जम्मू आणि काश्मीर प्रशासकीय सेवेतील एका कर्तबगार अधिकाऱ्याला गमावले आहे. कालच (शुक्रवार, ९ मे) माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ते उपमुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित होते,” अशा शब्दांत अब्दुल्ला यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

“या धक्कादायक घटनेबद्दल व्यक्त होण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. हे खूप मोठे नुकसान आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो,” असे म्हणत ओमर अब्दुल्ला यांनी थापा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. सीमेवरील तणाव वाढल्यानंतर, राज कुमार थापा यांच्यावर नागरिकांच्या मदतीसाठी आणि समन्वय साधण्यासाठी विशेष जबाबदारी सोपवण्यात आली होती. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराकडून जम्मू-काश्मीरमधील गावांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्लेही सुरू आहेत, ज्यांना भारतीय लष्कराने प्रभावीपणे परतवून लावले आहे.

दरम्यान, ९-१० मेच्या (May 9-10) रात्री पाकिस्तानने भारतावर पुन्हा हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न केला, जो भारतीय संरक्षण दलांनी हाणून पाडला. यानंतर पाकिस्तानने ‘फतेह-१’ (Fatah-1) क्षेपणास्त्र डागले, परंतु तेही भारतीय संरक्षण यंत्रणेने हवेतच निष्क्रिय केले. या सततच्या आगळीकीला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

पाकिस्तानमधील काही महत्त्वाच्या ठिकाणी मोठे स्फोट झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानच्या चार हवाई तळांजवळ हे स्फोट झाल्याची माहिती आहे. भारताने सहा बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे, तथापि, भारताने यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. या घटनांमुळे दोन्ही देशांमधील तणाव अधिकच वाढला असून, आंतरराष्ट्रीय समुदायाकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

टीम इंडियाला धक्का! विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार?

विमानप्रवाशांसाठी धक्कादायक बातमी! भारतातील ३२ विमानतळ बंद

जशास तसे! पाकिस्तानातील सियालकोटचा लष्करी तळ उद्ध्वस्त- सोफिया कुरेशी