टी-20 विश्वचषक 2026 च्या सुपर-8 फेरीत आज भारतीय संघासमोर (Chennai) झिम्बाब्वेचे कठीण आव्हान उभे आहे. 26 फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे होणारा हा सामना भारतासाठी अत्यंत निर्णायक मानला जात आहे. पहिल्या सुपर-8 सामन्यातील पराभवामुळे टीम इंडियावर मोठा दबाव असून, उर्वरित सामने जिंकणे आता अपरिहार्य झाले आहे.दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पहिल्या सुपर-8 सामन्यात भारतीय संघाला 76 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवाचा थेट परिणाम भारताच्या नेट रनरेटवर झाला असून तो -3.380 इतका घसरला आहे. त्यामुळे आता झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्धचे उर्वरित दोन्ही सामने भारतासाठी ‘करो या मरो’ स्वरूपाचे बनले आहेत. आजचा सामना जिंकणे पुरेसे नसून, मोठ्या फरकाने विजय मिळवणेही भारतासाठी तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.दुसरीकडे, झिम्बाब्वे संघालाही सुपर-8 मध्ये टिकून राहण्यासाठी विजय आवश्यक आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या सामन्यात झिम्बाब्वेला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते आणि त्यांचा नेट रनरेट -5.350 आहे. त्यामुळे उपांत्य फेरीच्या शर्यतीत स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी झिम्बाब्वेला भारताविरुद्ध विजय मिळवणे गरजेचे आहे. यामुळे आजचा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत चुरशीचा होण्याची शक्यता आहे.

या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार असून, (Chennai) झिम्बाब्वे संघाची कमान सिकंदर रजा यांच्या हाती आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत फक्त एकच सामना झाला असून, त्या सामन्यात भारताने 71 धावांनी विजय मिळवला होता. एकूण टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा विचार केला, तर दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 13 सामने झाले आहेत. यापैकी 10 सामने भारताने जिंकले, तर 3 सामन्यांत झिम्बाब्वेने भारतावर मात केली आहे. विशेष म्हणजे, 2024 मध्ये झिम्बाब्वेने आपल्या घरच्या मैदानावर भारताला पराभूत केल्याची आठवण अजूनही ताजी आहे.
आजचा सामना चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे. चेपॉक म्हणून ओळखले जाणारे हे मैदान पारंपरिकपणे फिरकीपटूंना मदत करणारे मानले जाते. मात्र, टी-20 विश्वचषक 2026 मध्ये या खेळपट्टीचे स्वरूप काहीसे बदललेले दिसत आहे. या स्पर्धेत सरासरी धावा आणि स्ट्राइक रेटच्या बाबतीत हे मैदान आतापर्यंत सर्वोत्तम ठरले आहे.आयपीएल 2025 पूर्वी या मैदानाची खेळपट्टी नव्याने तयार करण्यात आली असून, त्यानंतर येथे कोणताही देशांतर्गत किंवा स्थानिक सामना झालेला नाही. आज काळ्या मातीच्या खेळपट्टीवर सामना होणार आहे. याच पिचवर न्यूझीलंडने अफगाणिस्तानविरुद्ध केवळ 17.5 षटकांत 183 धावांचे लक्ष्य पार केले होते, यावरून फलंदाजांना येथे चांगली साथ मिळू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.हवामानाच्या दृष्टीनेही आजचा दिवस महत्त्वाचा आहे. चेन्नईत आज हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता असून, मात्र उष्णता जाणवेल. दिवसाचे कमाल तापमान सुमारे 32 अंश सेल्सियसपर्यंत जाऊ शकते. नाणेफेकीच्या वेळी तापमान 28 अंशांच्या आसपास राहील. सामना जसजसा पुढे जाईल, तसतसे तापमान थोडे कमी होईल, पण हवेतील आर्द्रता वाढून सुमारे 84टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे खेळाडूंना उकाडा आणि दमट हवामानाचा सामना करावा लागणार आहे.
हेही वाचा :
शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!