नागपूर महानगरपालिकेत मेगाभरतीची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत. आरोग्य, तांत्रिक आणि प्रशासकीय विभागांतील रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. राज्यातील सुशिक्षित तरुणांसाठी ही सरकारी सेवेत रुजू होण्याची मोठी संधी आहे.

राज्यातील महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वत्रच मेगाभरतीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. ठाणे महापालिकेपाठोपाठ नागपूर महानगरपालिकेतील रिक्त पदांमुळे प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. (Nagpur) तसेच यामुळे नागरी सेवांमध्ये विलंब होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिका प्रशासनाने आता मोठ्या भरतीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नवनियुक्त आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी पालिकेतील रिक्त असलेल्या ८,६५९ पदांवर भरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. या मेगाभरतीमुळे शहरातील हजारो तरुणांना सरकारी सेवेत येण्याची संधी मिळणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागी नवीन भरती झालेली नाही. यामुळे पालिकेत मनुष्यबळाचा अभाव ठळकपणे जाणवत होता. विशेषतः आरोग्य विभाग, स्वच्छता, अग्निशमन आणि तांत्रिक विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या निम्म्याहून कमी झाली होती. डॉ. इटनकर यांनी पदभार स्वीकारताच सर्व विभागांचा आढावा घेतला. यानंतर रिक्त जागांचा आकडा समोर येताच ही भरती प्रक्रिया प्राधान्याने राबवण्याचे आदेश दिले आहेत.
यानुसार नागपूर महापालिकेत केवळ तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील पदेच नाही, तर वरिष्ठ स्तरावरील रिक्त पदे भरण्यासाठीही पावले उचलली जाणार आहेत. वरिष्ठ पदांवरील रिक्त जागांमुळे धोरणात्मक निर्णय घेण्यास विलंब होतो. (Nagpur) त्यामुळे राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकारी आणण्यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.दरम्यान ही भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक अशा दोन्ही प्रवर्गातील पदांचा समावेश असेल. आगामी काळात या भरतीबाबतची अधिकृत जाहिरात आणि अर्जाची प्रक्रिया महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल, अशी माहितीही समोर आली आहे.
नागपूरसोबतच ठाणे महानगरपालिकेतही मेगाभरतीची जोरदार तयारी सुरू आहे. ठाणे पालिकेने देखील आपल्या विविध विभागांमधील रिक्त जागांचा तपशील तयार केला आहे. (Nagpur) यानुसार आरोग्य आणि तांत्रिक संवर्गातील पदांना प्राधान्य दिले जात आहे. ठाणे पालिकेच्या या भरती प्रक्रियेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, मुंबई महानगर प्रदेशातील उमेदवारांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे. ठाणे आणि नागपूर या दोन्ही शहरांमध्ये एकाच वेळी होत असलेल्या या हालचालींमुळे महानगरपालिका प्रशासनातील कार्यक्षमता वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा :
खुशखबर! WhatsAppचं भन्नाट फीचर, App डाउनलोड न करता आता करा थेट चॅट
विराटचं मिशन नंबर 1, किंग कोहली 19 व्या हंगामासाठी सज्ज, मोठा विक्रम निशाण्यावर
एकनाथ शिंदेंनंतर आता शिवसेनेचा हा बडा नेता दिल्ली दौऱ्यावर, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण