‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही 2000 च्या दशकातील प्रत्येक मुलाच्या आठवणीतील एक महत्त्वपूर्ण भाग आहे. जसजशी ही मालिका पुढे गेली, तसतसे त्यातून काही कलाकार बाहेर पडले. प्रेक्षकांनी या बदलाचाही खुल्या मनाने स्वीकार केला. आजही लहानांपासून मोठ्यांपर्यंत.. प्रत्येक वयोगटातील प्रेक्षक या मालिकेचा चाहता आहे. आता तब्बल 17 वर्षांनंतर ही मालिका बंद होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांवर खुद्द निर्माते असित कुमार मोदी यांनी उत्तर दिलं आहे. 2008 मध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. तेव्हापासून या मालिकेनं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे.

नवीन एपिसोड्सची वाट पाहण्यापासून ते रविवारी पुनर्प्रक्षेपणासाठी टीव्हीसमोर बसण्यापर्यंत.. या मालिकेच्या टप्पू सेनेसोबत एक संपूर्म पिढीच वाढली. गेल्या काही वर्षांत या मालिकेतून अनेक कलाकार निघून गेले, परंतु त्याची लोकप्रियता कमी झाली नाही. आता या मालिकेच्या भविष्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे.

याविषयी निर्माते असित मोदी एका कार्यक्रमात म्हणाले, “ही मालिका अजूनही सुरू आहे आणि आम्ही तो शक्य तितका काळ चालू ठेवू. लोकांना अजूनही ही मालिका खूप आवडतेय. तारक मेहता हा एक असा शो आहे, जो प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणि त्यांच्या आयुष्यात आनंद आणतो. मला आनंद आहे की लोक ही मालिका अत्यंत आनंदाने पाहतात. ही फक्त एक मालिका नाही, तर हा एक ब्रँड आहे. ज्याला प्रेक्षकांकडून सातत्याने प्रचंड प्रेम मिळतंय. त्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे आणि माझी टीमसुद्धा कठोर परिश्रम करतेय.”

यावेळी असित मोदी यांनी टीव्ही आणि ओटीटीमधील संबंधांविषयीही भाष्य केलं. ते म्हणाले की, तंत्रज्ञानामुळे निश्चितच फरक पडतो. लोक म्हणतात की टीव्हीवरील प्रेक्षकसंख्या कमी झाली आहे, परंतु जर तुम्ही चांगला कंटेंट दाखवत राहिलात, तर प्रेक्षक नक्कीच परत येतील, असा माझा विश्वास आहे. टीव्ही संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणतो. संपूर्ण कुटुंब ते एकत्र बसून पाहतं. त्यामुळे टीव्हीचं स्थान कायम राहील. आज प्रत्येक प्लॅटफॉर्मवर चांगला कंटेंट उपलब्ध आहे. ओटीटी असो किंवा टीव्ही किंवा सोशल मीडिया.. प्रेक्षकांकडे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. आता आमची मालिकासुद्धा विविध अॅप्सवर उपलब्ध आहे, असं त्यांनी सांगितलं.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *