कोल्हापूर जिल्ह्यातील येथे आदमापूर सद्गुरू बाळूमामा यांच्या भंडारा यात्रेनिमित्त (Incident)आयोजित करण्यात आलेल्या रथोत्सवावेळी लस्सी पिल्यानंतर अनेक भाविकांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे सोलापूर, सांगली, मिरज, बारामती, जालना, कोल्हापूर तसेच कर्नाटकातून आलेल्या सुमारे शंभराहून अधिक भाविकांना उलट्या-जुलाबाचा त्रास सुरू झाला. सायंकाळी पाचनंतर अचानक अनेकांना अस्वस्थ वाटू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.यात्रेनिमित्त दुपारी पार पडलेल्या रथोत्सवाला हजारो भाविक उपस्थित होते. उन्हाचा तडाखा असल्याने मुरगूड-मुदाळतिट्टा मार्गावर विविध सेवाभावी संस्था, तरुण मंडळे आणि काही व्यक्तींनी भाविकांना थंड पाणी, लस्सी, सरबत, कोकम, ताक, मठ्ठा यांसारखी शीतपेये तसेच केळी, खिचडी आणि राजगिरा लाडू यांचे वाटप केले होते. दिवसभर भाविकांनी या पेयांचा आस्वाद घेतला. रात्री भाकणुकीचा कार्यक्रम असल्याने अनेक भाविक तेथेच थांबले होते. मात्र सायंकाळी काही जणांना अचानक उलट्या, पोटदुखी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला आणि पाहता पाहता अशा रुग्णांची संख्या वाढत गेली.

घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाला सतर्क करण्यात आले. (Incident)परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्रास होणाऱ्या भाविकांना तातडीने विविध शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. अनेक रुग्णांना मुरगूड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर काहींना गार्गोटी उपजिल्हा रुग्णालय, सरवडे, माडिलागे तसेच आदमापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. बहुतांश रुग्णांना १०८ रुग्णवाहिकेद्वारे तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. काही रुग्णांवर रुग्णवाहिकेतच प्राथमिक उपचार करण्यात आले.रात्री उशिरापर्यंत विविध रुग्णालयांत मिळून अनेक रुग्णांवर उपचार सुरू होते. मुरगूड ग्रामीण रुग्णालयात अनेक भाविकांना दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. गारगोटी येथील रुग्णालयातही काही भाविकांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले असून अधीक्षक डॉ. पल्लवी तारळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत.
दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार बाळूमामा देवस्थान ट्रस्टचे रुग्णालयही (Incident) तातडीने सुरू करण्यात आले आणि तेथेही काही रुग्णांवर उपचार करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार रथोत्सवावेळी रस्त्यावर उघड्यावर वाटप करण्यात आलेल्या लस्सीमुळे ही विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी प्रशासनाकडून तपास सुरू करण्यात आला आहे.यात्रेसाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह कर्नाटकातूनही मोठ्या संख्येने भाविक आल्यामुळे नेमकी रुग्णसंख्या निश्चित करणे कठीण झाले आहे. काही रुग्णांनी उपचारानंतर घरी परतण्याचा निर्णय घेतला असून काहींनी खासगी रुग्णालयात उपचार घेतल्याची माहिती समोर आली आहे. सध्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवक मिळून रुग्णांवर उपचार करत असून बहुतांश रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.
हेही वाचा :
धक्कादायक, लग्नास नकार दिल्याने तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले
भर उन्हाळ्यात कोल्हापुरात अवकाळी पाऊस; गारपीटीमुळे नुकसानाची शक्यता
संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईत अडकलं, पण भारतानं करून दाखवलं, 7 सर्वात मोठ्या गुड न्यूज