देशात पेट्रोल आणि डिझेलच्या (prices)वाढत्या किमतींमुळे सामान्य नागरिकांच्या खिशावर ताण वाढत असतानाच केंद्र सरकारने ‘प्लॅन बी’ तयार केल्याची माहिती समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरातील चढ-उतार आणि पुरवठ्यातील अनिश्चितता लक्षात घेऊन सरकारने पर्यायी उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे.

यामध्ये इंधन साठवण क्षमता वाढवणे, विविध देशांकडून आयात स्रोतांचे विविधीकरण करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत तुटवडा टाळण्यासाठी धोरणात्मक साठा वापरण्याची तयारी यांचा समावेश आहे.सध्या जागतिक पातळीवरील तणावपूर्ण परिस्थितीमुळे तेलाच्या किमतींमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम भारतासारख्या आयात-आधारित देशावर होत असून भविष्यात दरवाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, नागरिकांना इंधनाचा तुटवडा जाणवू नये यासाठी सरकारने आधीच खबरदारी घेतली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य देत सरकार दीर्घकालीन उपाययोजनांवरही भर देत आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा प्रसार, जैवइंधनाचा वापर वाढवणे आणि स्थानिक उत्पादनाला चालना देणे यांसारख्या पर्यायांवरही लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यातील संकटांचा परिणाम कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.