आधी पाऊस पडतो मग हवामान विभागाकडून इशारा; अंदाज हलक्या ते मध्यम सरींचा, मात्र प्रत्यक्षात मुसळधार

मुंबईत हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती.(light ) परंतु, सोमवारी हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज वर्तवल्यानंतर, अचानक ऑरेंज अलर्ट जारी केल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली. पुढील तीन तासांच्या पावसाचा अंदाज अचूक येत असला तरी, वेळेवर दिलेल्या अलर्टमुळे मुंबईकरांची चिंता वाढली.

मुंबई : मुंबईमध्ये जून आणि जुलै महिन्यात मुसळधार पाऊस न पडल्याने दीड महिन्यामध्ये हवामान विभागाच्या अंदाजावर फारशी टीका झाली नव्हती. मात्र मंगळवारी सकाळपासून पावसाला सुरुवात झाल्यानंतर प्रादेशिक हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट अद्ययावत केल्यामुळे हवामान विभागाच्या अंदाज वर्तवण्यावर टीकेची झोड उठली. सोमवारी वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई आणि महामुंबई परिसरात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता होती. मात्र दुपारनंतर हा इशारा अचानक ऑरेंज अलर्ट म्हणून अद्ययावत करण्यात आला.

कोकणात ऑरेंज अलर्ट
सोमवारी रात्री दिलेल्या अंदाजानुसार मंगळवारी सकाळी साडेआठ ते बुधवारी सकाळी साडेआठपर्यंत (light ) संपूर्ण कोकण विभागात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता होती. मात्र मंगळवारी सकाळपासून मुंबई तसेच नवी मुंबईच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढला. त्यानंतर दुपारी १२ च्या सुमारास प्रादेशिक हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला.

मध्य मुंबईत जोरदार पाऊस
पावसाचा जोर मध्य मुंबईत अधिक होता. कुलाबा केंद्रावर सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाचपर्यंत चार मिलीमीटर तर सांताक्रूझ केंद्रावर सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच पर्यंत ५४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. प्रादेशिक हवामान विभागाने दुपारी अद्यावत केलेल्या अंदाजानुसार ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये वेगवान वाऱ्यांसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. हा इशारा बुधवारी सकाळी साडेआठ पर्यंत लागू होता. यामध्ये सांताक्रूझ वगळता रत्नागिरी, डहाणू या केंद्रांवर दिवसभरात फारसा पाऊस नोंदला गेला नाही. अलिबाग येथे दिवसभरात ३८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

नाऊकास्ट – पुढील तीन तासांच्या पावसाचा अंदाज
मुंबईत सध्या नाऊकास्ट म्हणजे पुढील तीन तासांच्या पावसाचा अंदाज अधिक अचूक नोंदवला जात आहे. (light ) मात्र हा नाऊकास्टचा अंदाज देऊन लोकांना फारसा फायदा होत नाही. घराबाहेर पडणारी मंडळी नाऊकास्टच्या अंदाजाकडे लक्ष देत नाहीत. ऑरेंज अलर्टसारखा अंदाज आयत्या वेळी दिला की अचानक निर्माण होणारी पूरस्थिती लक्षात घेता मुंबईकरांची चिंता अधिक वाढते, अशी प्रतिक्रिया मुंबईकरांमध्ये उमटली. यासोबतच मुंबईकरांना एसएमएसच्या माध्यमातून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या ई वॉर्निंगमध्ये दुपारी चार वाजताच्या सुमारास मेघगर्जना, विजांचा कडकडाट यासह पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली होती. त्यामुळे घरी जाणाऱ्या नोकरदार वर्गामध्ये चिंता होती.
नद्यांना पूर, रस्ते पाण्याखाली, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, कोकणात मुसळधार पाऊस!

घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट
यासंदर्भात मध्य प्रदेशावरील कमी दाबाचे क्षेत्र तसेच कोकण किनारपट्टीवरील आणि समुद्रातील वाऱ्यांचा वेग वाढल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी दिली. घाटमाथ्यावरही पुणे, सातारा येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. दिवसभरात महाबळेश्वर येथे ६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

हेही वाचा :