महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी प्रवास व्यवस्थेत (travel) आता डिजिटल युगाची अधिकृत सुरुवात झाली आहे. रोख व्यवहारांपासून दूर जात प्रवाशांना अधिक पारदर्शक आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ प्रणाली लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती देताना याला प्रवासी सेवेतला ऐतिहासिक टप्पा असल्याचे म्हटले आहे. यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे.मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, ही केवळ तांत्रिक सुधारणा नसून प्रवाशांच्या विश्वासाला डिजिटल बळ देणारे पाऊल आहे. सवलतींची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोखविरहित व्यवहार या सुविधा एका कार्डद्वारे उपलब्ध होणार आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महामंडळाने मे. ईबिक्स टेक्नोलॉजिस लिमिटेड आणि एनएसडीएल पेमेंट्स बँक यांच्याशी करार केला असून लवकरच राज्यातील सर्व आगारांमध्ये नोंदणी मोहीम सुरू केली जाणार आहे.

या योजनेत समाजातील विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे.(travel) शालेय तसेच तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ‘सरल’ क्रमांकाशी संलग्न कार्ड दिले जाईल. अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड देण्यात येणार आहे. दिव्यांग प्रवाशांसाठी UDID क्रमांकाशी जोडलेले विशेष कार्ड उपलब्ध होईल. तसेच स्वातंत्र्यसैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालयामार्फत कार्डचे वितरण केले जाणार आहे.
नवीन कार्डची किंमत जीएसटीसह १९९ रुपये निश्चित करण्यात आली आहे.(travel) जुन्या स्मार्ट कार्डचा जमा पर्याय स्वीकारल्यास १४९ रुपयांत नवीन कार्ड मिळू शकते. या कार्डमध्ये किमान १०० रुपयांपासून रक्कम भरता येईल आणि ५० रुपयांच्या पटीत रिचार्ज करता येणार आहे. रिचार्जसाठी ईटीआयएम मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल अॅप किंवा नियुक्त एजंटची सुविधा उपलब्ध राहील.
ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी राज्यभरात ३००० हून अधिक(travel) अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आले आहेत. बसस्थानकांवरच नोंदणीची प्रक्रिया पार पडणार असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.एसटीचा हा निर्णय पारंपरिक प्रवास व्यवस्थेला डिजिटल स्पर्श देणारा ठरत आहे. तिकीट आणि सुट्ट्या पैशांची चिंता आता मागे पडणार असून एका स्मार्ट कार्डच्या माध्यमातून प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक होणार असल्याचा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
हेही वाचा :
T20 World Cup 2026 : दुखापतीला आणखी 1 विकेट, मॅचविनर खेळाडू वर्ल्ड कप स्पर्धेतून आऊट
Jeffrey Epstein Files : जेफ्री एपस्टिनच्या रेड रुममध्ये काय घडायचं ? जगातील सर्वात सुंदर तरुणी…